व्हायचे ते नेमके झाले म्हणावे
दोष अपुला मानुनी मी का कुढावे?
देवद्वारी फक्त माथा टेकल्याने
"संकटे पळतील" हे का बिंबवावे?
आसवांनो बांध तोडा पापण्यांचे
का कपारींना मनाच्या चिंबवावे?
आज अन् ज्यांचा उद्या अंधारमय, त्या
माणसांनी भूतकाळी झगमगावे
मीच कर्ता आजच्या माझ्या व्यथांचा
प्रश्न माझे निश्चये मी सोडवावे
वेदनांचे चैत्रबन मंत्रावलेले
त्यात जगलो, भाग्य फुलले मी म्हणावे
का असे गुंत्यात नाते गुंतलेले?
काच का इतके मनाला करकचावे?
वाद दोघांचा कसा गेला शिगेला?
का असे उन्मुक्त भरकटतात रावे?
वेगळा "निशिकांत" होता काळ तो पण
संपलेल्याचे किती कौतुक करावे?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com