Wednesday, September 2, 2015

कर्ज नाही घेतले


जीव तारण ठेवला पण कर्ज नाही घेतले
मी सवर्पण भाव जपला, प्रेम नाही तोलले

ठीक झाले दूर तू गेलीस माझ्या पासुनी
मुल्य तुझिया संगतीचे त्यामुळे मी जाणले

हीर-रांझाची कहाणी वाचुनी भयग्रस्त का?
पाश विरहाचे गळ्याला काचले तर काचले !

आसवांच्या गर्द शाईने लिहावी शायरी
कागदाने ओघळावे, अर्थ कळता त्यातले

पिंपळाचे पान जाळीदार सुकलेले तरी
जागवी हिरवळ मनी अन् गूज गतकाळातले

थांबते का काम केंव्हा? ये, न ये तू पावसा!
आसवांचे ढग बघोनी, मोर दारी नाचले

नाव का वारांगनांना दांभिकांनो ठेवता?
चेहरे त्या सभ्यतेच्या, जाणती बुरख्यातले

नग्न साधू नाहताना, बाटली गोदावरी
कुंभमेळा संपल्यावर हाय! तिजला वाटले

प्राक्तनी जे व्हायचे ते होत असते पण तरी
पूजसी "निशिकांत" पण तू देव का दगडातले?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com