Tuesday, October 17, 2017

अशी सोच आहे


असो सावली, ऊन जगतोच आहे
सदा खुश असावे अशी सोच आहे

कशाला करावी फिकिर वादळाची?
तसा आतल्याआत खचतोच आहे

उधारीत का सुख, नि नगदीत दु:खे?
जगावे कसे? प्रश्न उरतोच आहे

जरी प्रश्नचिन्हात अस्तिस्त्व देवा
तुझी आरती रोज करतोच आहे

जुनी कागदी नाव भिजलीच नाही
तरी बालपण रोज स्मरतोच आहे

न करताच पापे घडा का भरावा?
अशी चित्रगुप्ता! मनी बोच आहे

कसा कावळा आज पिंडास शिवला?
जरी आपुल्यांच्यात फसलोच आहे

अता काय झाकू? जगापासुनी या
नको मी तसा आज दिसलोच आहे

हवे ते तसे का कधी होत नाही?
तुझे प्राक्तना खेळ बघतोच आहे

तुला एवढी काय "निशिकांत" चिंता?
प्रभू अन्न देतो जिथे चोच आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, October 15, 2017

आसवे गळती किती?


दोन पुतळे, म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू, संगमरमर आसवे गळती किती?

एक गांधी त्यात होते, सांगती दुसर्‍यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?

भोवताली मद्य विक्री मासही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? वेदना सलती किती?

देउळे, मशिदी उगा का भांडती हे ना कळे
पाठ माझे अंहिसेचे खिजउनी हसती किती?

संसदेमध्ये कशाला टांगली तसवीर हो?
भूल, थापा, घोषणांची भोवती चलती किती?

लागले अंबेडकरही दु:ख अपुले सांगण्या
खूप पुतळे गाव, शहरी, लोक ते बघती किती?

जाहलो मी अडथळा का? वर्दळीमध्ये असा
नाळ जुडलेली धुळीशी श्वास अडखळती किती?

व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते
हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती

छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी
डोंब उसळे दंगलीचा, झोपड्या जळती किती?

का मला ठाऊक नाही? कोण वापरते मला
शांत बघतो, निर्बलांना धेंड कुरतडती किती?

चल जरासे विठ्ठलासम, वीट घे! राहू उभे
निर्विकारी शांत असता लोकही भजती किती?

हे बरे "निशिकांत" केले राखला छोटेपणा
स्वर्गवासी होउनीही यातना छळती किती?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३









Tuesday, October 3, 2017

चाहुल हल्ली लागत नाही


पायामधले पैंजण आता वाजत नाही
सख्यास माझ्या चाहुल  हल्ली लागत नाही

एक जखम जी दिली सख्याने विचित्र इतकी!
खपली बसते वरून, हृदयी वाळत नाही

पूजा, अर्चा, फुले वाहता देव तुष्टतो
निर्माल्याला पण तो केंव्हा पावत नाही

जगून जीवन होरपळीचे, मृत्यू येता
सुटका झाली, अता चिताही पोळत नाही

नका न्याहळू क्षणोक्षणी मी कसा वागतो
ठेवत माझ्यावरती मीही पाळत नाही

"मागे बघुनी पुढे जायचे" कोण म्हणाले?
इतिहासाचे पान कधी मी चाळत नाही

जशी उसवली घट्ट वीण माझी माझ्याशी
भय कसलेही पैलतिराचे वाटत नाही

संसर्गाची खूप काळजी सदैव घेतो
म्हणून गझला इतरांच्या मी वाचत नाही

ध्यान असूद्या दुरावलेल्या आप्तेष्टांनो
स्पष्ट बोलतो, कधी अंतरी साचत नाही

नकोस तू "निशिकांत" घाबरू, मावळतीला
मनी रितेपण तरी उदासी मावत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३