व्हायचे ते मोकळे अन् स्पष्ट झाले पाहिजे
साथ तू देशील कुठवर हे कळाले पाहिजे
पूर्तता एका अटीची प्रेम करताना हवी
संशयाचे भूत आधी धुम पळाया पाहिजे
राव-रंकातील खाई पेटुनी उठण्याअधी
गाळल्या घामास मोठे मोल आले पाहिजे
दंगलीने पोळल्यांची सांत्वने फसवी किती!
करवित्याचेही विधात्या! घर जळाले पाहिजे
जर वसंताने नटावे आस अंकुरली मनी
वृक्ष जाणे पान शेवटचे गळाले पाहिजे
"दे हरी बाजेवरी" हे तत्व नाही या जगी
सागरी, मोती हवे तर, मज बुडाले पाहिजे
पाप करण्याचा निराळा तर्क आहे हा किती!
स्नान गंगेचे कराया मन मळाले पाहिजे
सार का ज्ञानेश्वरीचे आठवेना शासना?
जे हवे ते ते जनालाही मिळाले पाहिजे
पाश का "निशिकांत" विणले? जे गळ्याला काचती
खेळ सरला या जगीचा, चल निघाले पाहिजे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment