Friday, July 4, 2014

नाळ जोडावी कशी?


जोडली नाती नवी पण जीर्ण विसरावी कशी?
कालच्यांची आजच्यांशी नाळ जोडावी कशी?

का पिढ्यातिल दोन झाला क्षीण धागा एवढा?
वानवा संभाषणाची रोज सोसावी कशी?

वेगळे होण्यास होती कारणे जुजबी किती?
आठवांशी, सांग तू, मी फारकत घ्यावी कशी?

नोंद दुसर्‍याचीच होती सात बारावर सदा
मालकीविन कष्टण्याची रीत मिटवावी कशी?

ना बडवले ढोल ज्यांनी, जाहिराती ना कधी
विश्वबाजारात गुणवत्ता लकाकावी कशी?

मावळे एकीकडे तर उगवतो दुसरीकडे
सूर्य चाकोरीस विटला, वाट बदलावी कशी?

जाहली चोरी मनाची, त्रास सरला वाटले
चोरणारी काळजातुन दूर सारावी कशी?

भकरीचा चंद्र ज्यांच्या प्राक्तनी नव्हता कधी
पौर्णिमेच्या चांदण्याने भूक भागावी कशी?

तंग का "निशिकांत" सुचला काफिया इतका तुला?
पाच शेरांची गझलही पूर्ण रे! व्हावी कशी?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment