तू त्रिजा अन् मी जरी का व्यास आहे
वर्तुळी एकाच अपुला वास आहे
वास्तवाचे ध्यान ठेवत वागल्याने
फुलविला परिघातही मधुमास आहे
आठवांच्या जळमटांना झाडल्याने
"शांतता लाभेल" मिथ्या भास आहे
नष्टलो ज्या कैक भूकंपात सखये
केंद्रबिंदू तूच हा इतिहास आहे
एक चुकले ! सर्व अपुले मानल्याने
वंचनांची जीवनी आरास आहे
लोकलज्जेस्तव जराशी चाड होती
आज सारे चालले सर्रास आहे
खेचले स्वर्गातुनी, दगडात आता
भाविकांनी कोंडले देवास आहे
राहतो भगव्यात भरण्या पोट माझे
घेतलेला मी कुठे सन्न्यास आहे ?
सत्तरी "निशिकांत"ची उलटून सुध्दा
त्यास हिरव्या शायरीचा ध्यास आहे
निशिकांत द्वेशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment