माणसे जोडावयाचे स्वप्न माझे भंगले
भोवती गर्दी असोनी एकलेपण सोसले
आदिमाया, आदिशक्ती फक्त लिहिण्या, वाचण्या
चौकटी करुनी प्रथांच्या आत स्त्रीला डांबले
मी नियोजनबध्द जगलो, ठरवुनी पण ईश्वरा!
का तिकिट परतावयाचे तारखेविन छापले?
चंद्र शीतळ पण सखीच्या आठवाने कैकदा
वाढली तगमग, पिठोरी चांदणेही पोळले
शेतमजुरांच्या ललाटी फक्त असते राबणे
सात बारावर कधी ना नाव त्याचे लागले
जिंकण्याची शतपटीने वाढते तेंव्हा मजा
हार झालेली बघाया लोक असता थांबले
का कुणी धरतो अबोला चार भिंतीशी कधी?
सुरकुत्यांनी कोपर्यांशी फक्त नाते ठेवले
पाप-पुण्याची न धास्ती नास्तिकांना वाटते
तेच चिंताग्रस्त जे जे मंदिरी भक्ताळले
वावडे "निशिकांत" आहे का सुखांचे एवढे?
दु:ख माझ्या अंगणी मनसोक्त होते नांदले
निशिकांत देशपांडे. मो,क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment