Thursday, April 21, 2016

गेले विकोपाला


गौण होते वाद पण गेले विकोपाला
आत्मप्रौढी बाधली होती समेटाला

मान्य आहे त्रस्त तुझिया मी वियोगाने
आठवांची बाग आहे दरवळायाला

चाहुलीनेही सखे गंधाळतो मी पण
वाटते का दरवळावे सोनचाफ्याला?

हार होता दोष झटकाया म्हणावे की
तेच घडते जे हवे असते विधात्याला

सर्व स्वप्ने पूर्ण झाली, त्या अभाग्यांच्या
जीवनी ना ध्येय उरते धडपडायाला

चार भिंती, चौकटी, गुदमर कशासाठी?
तोड अबले! चक्रव्यूहाच्या परीघाला

ना दिले भक्तास दर्शन तू कधीही पण
विरहिणी दिधलीस देवा गुणगुणायाला

हात माझे, पाय माझे, कष्टही माझे
फायदा का एवढा टाटा नि बिर्लाला?

जीवनाची नाव डगमगता नको चिंता
काळजी "निशिकांत" रे!असते खलाशाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



No comments:

Post a Comment