Tuesday, June 26, 2018

शेत बहरले असते


कवितांच्या जर वर्षावाने शेत बहरले असते
कशास विकले फास घ्यावया दोर एवढे असते?

बारा महिने मोसम असतो कविता बरसायाचा
दु:ख कशाचे? शब्द कळांना जोजवायचे असते

पाउस येण्या अधीच ठरती मुशायरे गझलांचे
ग्रिष्मामधली गझल श्रावणी शायरांकडे असते

मृगनक्षत्रातील पावसा! हरवलास तू कोठे?
वेळेवर असतास बरसला, शेत पेरले होते

नकोच पाउस, ढगा! गळू दे चार आसवे बघुनी
फासावरती चढणार्‍यांचे दु:ख केवढे असते

तुला यायचे असेल तर ये अथवा नकोस येऊ
इथे पावसा दुष्काळाचे कुणा वावडे असते?

वारीमध्ये ब्रह्मानंदी टाळी लागत नाही
विठू ऐवजी ध्यान आमुचे पावसाकडे असते

टपटप वाजे पत्र्यावरती पाउस खेड्यामध्ये
नकळत येतो, जातो शहरी, असे घर बडे असते

होती ना "निशिकांत" कपारी ओल्या ह्रदयामधल्या!
बरसातीविन ओल, सखीचे जेथे घरटे असते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


No comments:

Post a Comment