नकोच चर्चा कोण कुणाशी कसा वागला होता
आयुष्याचा काळ तसाही बरा चालला होता
पालवलेली सृष्टी सुध्दा मनास भावत नव्हती
तू गेल्यावर सदा जीवनी ग्रिष्म नांदला होता
गतसाली गर्भार ढगांचा वांझोटा जल साठा
प्रदूषणाला भिऊन गर्भाशयी गोठला होता
काळ बदलला, गजरा आता कोणी माळत नाही
कधी मोगरा शृंगाराचा भाग जाहला होता
स्वार्थ साधण्या आयुष्याला नकात देऊ वळणे
म्हणाल नंतर धोपट रस्ता किती चांगला होता
गावाकडचा शेणसडा अन् अंगणात रांगोळी
शहरी निघता, एक उसासा खोल दाबला होता
"होकारासन" रोज करा पोरांनो शांतीसाठी
हुकुमी एक्का हा आम्हीही कधी खेळला होता
सर्व उत्तरे सापडल्यावर काय करावे पुढती?
प्रश्न सोडवाया हा, नवखा प्रश्न गावला होता
विकून का "निशिकांत" टाकली शेती गावाकडची?
भुलून शहरावरती निर्णय चूक घेतला होता
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment