भक्तीत रंगल्याने माझा अहं गळाला
माझ्यात कोंडलेला "मी' बंधमुक्त झाला
दसर्यास जाळुनीही दरसाल रावणाला
नाही लगाम त्याच्या बेबंद वागण्याला
वाटे घृणा मनाला सव्हीस आकराला
मुंबापुरीत हिजडा नापाक पाक आला**
गावात जाहल्यावर मृत्यू, खुशी कुणाला?
मसणात काष्ट विकुनी भरतोय पोट त्याला
होता उशास धोंडा अन् खावयास कोंडा
आहे तरी सुखात्मा, समजावले मनाला
काखेत घेत कळसा, गावास व्यर्थ वळसा
आतील देव बघण्या यात्रा हवी कशाला?
मज सावली मिळाली उपकार हे कुणाचे?
मी धन्यवाद म्हटले रखरख कडक उन्हाला
फिरणे हवेत सरले, जर दोष द्यायचा तर
आम्हीच निर्मिलेल्या आहे प्रदूषणाला
"निशिकांत" विठ्ठलाचा याचक कधीच नव्हता
शोधात शाश्वताच्या, त्यागून भौतिकाला
**ही गझल २६.११ ला लिहिली; म्हणून हा प्रासंगीक शेर.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--आनंदकंद
लगावली (गागाल गाल गागा)X२
No comments:
Post a Comment