Friday, May 15, 2020

आज कसे पाझरते?


काळाच्या ओघात हरवले तेच कसे आठवते?
दु:ख कालचे नजरकडांवर आज कसे पाझरते?

रामायण जर माझ्याकडुनी लिहिले गेले असते
अग्निपरिक्षा जानकीस दे राम म्हणाले नसते

आषाढी वारीला जातो, मधेच वापस येतो
वारकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये विठ्ठल मूर्ती दिसते

कौरव, पांडव जरी संपले महाभारतामधले
व्याकुळलेली आज द्रौपदी पदोपदी आढळते

दोन किनार्‍यांचे उंबरठे लंघत नसून सुध्दा
विलीन होण्या नदी सागरी मुक्तपणे खळखळते

सोपे नसते दु:ख सांगणे आपुल्यासही इतके!
आपसूक कविता, गझलेतुन गूज मनीच्वे खुलते

अमेरिकेच्या सर्व्हर मधुनी चॅटिंग दोघे करती
ती शेजारिण अपुली आहे हे त्याला ना कळते

स्क्वेअरफुटच्या सदनिकेतुनी लोक नांदती हल्ली
वाडा, अंगण इतिहासाचे पान जाहले नुसते

सूर कसा "निशिकांत "लागला आज एवढा दु:खी
ती नसताना आनंदाची लाट हळू ओसरते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment