रानवारा झेलला अन् वादळेही सोसली
पाहुनी शहरात झगमग, वेस नाही सोडली
घर चिरेबंदी छताला लाकडांचे माळवद
जंगले काँक्रीटची नाही मनाला भावली
लेक निघता सासराला गाव देई हुंदके
लेक सार्यांचीच! आम्ही उभयतांनी पोसली
गैरसोयी खूप पण मी एकटा नव्हतो कधी
वीण नात्यातील होती घट्ट, नाही उसवली
रामकाठी बाभळीला सावली नसते कधी
मी कधी उपयोगिता ईंचात नाही मोजली
वादळावे माणसाने अडचणींच्याही सवे
जीवनाचा स्वाद घेण्याची कला अभ्यासली
चौकटी तोडीत केली जीवनाची मी सफर
का असे जगलो? कधीही खंत नाही वाटली
पापियांनो मार्ग बदला, पुण्य संचय वाढवा
धूत होती पाप ती गंगाच आहे बाटली
वाजवावे दार का मृत्यू असे " निशिकांत "चे?
बंडखोरी ब्रीद त्याचे, हार नाही मानली
निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment