जाहलो होतो बळी मी वंचनांचा
भोवती दुष्काळ होता आपुल्यांचा
मी कधी माझ्यावरी लिहिल्यास पुस्तक
नाव देइन " सहप्रवासी वादळांचा "
कोण कौरव, कोण पांडव? हे कळेना
दुर्गुण्यांना का मुलामा सज्जनांचा?
का अशी फसवेगिरी? वाढून नंतर
माणसे नैवेद्य खाती देवतांचा
ब्रह्मगाठीला पकडता भूत पळते
धाक सरला आज येथे जानव्यांचा
देशद्रोहाचा विडा ज्यांनी उचलला
फुटिरवाद्यांना पहारा पोलिसांचा
दूर असताना विठू, वारीत होतो
दर्शनाचा सोहळा त्या पादुकांचा
देहबोली सांगते दुसरेच कांही
आव का मग भोगलेल्या वेदनांचा?
जा अता "निशिकांत "ही सोडून वस्ती
चालतो व्यवहार येथे बेरजांचा
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment