वाममार्गाची तशी तर भूक आहे भागलेली
शेवटी बिल्ली निघाली हजकडे संतुष्टलेली
प्राप्त केले जे हवे ते, जीवनी उत्सव तरी पण
माणसे दिसती न कोठे मोह माया सोडलेली
केवढा दुष्काळ आहे एकमेका समजण्याचा!
शेत असते, पण कशी ही माणसे भेगाळलेली?
विक्रमाला मौन जमले का? मला ठाऊक नाही
गप्प जनता! फौज नेत्यांची दिसे वेताळलेली
राज्यकर्ते भाजती सरणावरी पण आमटेंची
लष्कराच्या भाकरीला चूल होती पेटलेली
वादळाच्या आत असती कैक झुंडी वादळांच्या
वादळांची कारणे असती मने चुरगाळलेली
बेरजा शिकलो न केंव्हा ना गुणायाचे कधीही
भोगते पुंजी वजावट अन् चुकांनी भागलेली
तूच म्हण क्या बात है! अन् तूच म्हण इर्शाद सुध्दा
मख्ख श्रोत्यांनी गझल ही कैक वेळा ऐकलेली
जाहल्यावरती प्रवासी जीवनाच्या उतरणीचा
का अशी " निशिकांत "असते पापणी ओलावलेली?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment