वेदनेत श्रावणास शोधलेच पाहिजे
जग हवे! नको म्हणूस एवढेच पाहिजे
खडबडीत वाट जीवना तुझी अशी कशी?
लागली असून ठेच, चाललेच पाहिजे
सासरी सुनेस जाच आसपास पाहता
लेक आपुली म्हणून धावलेच पाहिजे
एकवाक्यता जरी असायला हवी तरी
वाजवी टिकेस रोज ऐकलेच पाहिजे
माय बाप गप्प! नातवास लावण्या वळण
मौन सोडुनी मुलास बोललेच पाहिजे
द्वंद्व गीत मी लिहून वाट पाहतो सखे
सूर मिळवुनी सुरात, गायलेच पाहिजे
वादळे कपातली उठावयास लागता
आपसात शमवण्यास भेटलेच पाहिजे
जायचे असेल येथुनी तुला, जरूर जा
जायच्या अधी वळून पाहिलेच पाहिजे
प्रश्न सर्व संपल्यास काय अर्थ जीवना?
उत्तरात प्रश्नचिन्ह गावलेच पाहिजे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment