वळणावरती शेवटच्या मन वळून बघते
येत असावे कुणी आपुले असे वाटते
देव न खातो तरी बया नैवेद्य वाढते
खाणार्यांना उपास करण्या शास्त्र सांगते
पहिल्या अन् शेवटच्या श्वासामधले अंतर
श्वास चालतो, म्हणून तर ते जीवन असते
चाल जीवना तुझी एवढी रटाळ आहे!
एक जमाना झाला जगतो रोज तेच ते
संभाषण संपले बघोनी घरातल्यांचे
अबोल सार्या, एक भिंतही कुठे बोलते?
फिरायला दिल्लीला गेलेल्या श्वानांना
प्रश्न सुटेना संसदेतही कोण भुंकते?
असेल वाटत भय वारीचे विठ्ठलासही
कोण करोनाबाधित आहे? कुणा न कळते
बैठकीतले वादळ आता सुरकुतल्याने
क्षीण होउनी वळचणीत मजबूर राहते
तुझा जरी बेगडी चेहरा सन्याशाचा
आसक्ती "निशिकांत "केवढी मनी नांदते!
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment